पुणे /आळंदी :- श्री ज्ञानेश्वर विद्यालयात सेवापूर्ती समारंभ संपन्न

पुणे /आळंदी :- श्री ज्ञानेश्वर विद्यालयात सेवापूर्ती समारंभ संपन्न
वार्ताहर:- अनिल जोगदंड
( महाराष्ट्र राज्य, मुख्य संपादक, indianow 24)
आळंदी देवाची येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील दिव्यांग विभागाच्या अध्यापिका संध्या भोज (२५ वर्ष सेवा) व अध्यापक जयवंत खुंटे (१७ वर्ष सेवा) तसेच प्रयोगशाळा सहाय्यक बाळासाहेब भोसले (३० वर्ष सेवा) व ग्रंथपाल शिवाजी जाधव (३१ वर्ष सेवा) यांनी प्रशालेत दिलेल्या योगदानाने संस्था / शाळेच्या प्रगतीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. या सर्वांनी आपली घरची जबाबदारी सांभाळत आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून व्यवसाय / नोकरी करण्या लायक बनविले. तसेच आपल्या मार्गदर्शन, कला व सहकार्यामुळे प्रशालेतील अनेक विद्यार्थी घडविले. अनेक जण उच्च पदावर कार्यरत आहेत. अशा गुणवंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संस्था / प्रशालेच्या वतीने भावनिक ऊत्साहाच्या वातावरणात सेवापूर्ती समारंभ संपन्न झाला. या निमित्ताने या चारही सेवानिवृत अध्यापक / अध्यापिका यांचा संस्था व प्रशालेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार, माऊलींची मूर्ती, सन्मान चिन्ह, सा रे ग म कारवा देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह. भ. प. एकनाथ म. कोष्टी तसेच श्री दत्त साई सेवा कुंज आश्रम, कासारवाडीचे विश्वस्त आणि प्रगतशील शेतकरी तथा गोसेवक विजयशेठ जगताप, दि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे चे चेअरमन प्रल्हाद कोकरे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, या सेवानिवृत्तांचे आप्तेष्ट, मित्र परिवार, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये अजित वडगावकर यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून देत त्यांचे सामाजिक तथा इतर क्षेत्रातील कार्य सांगून संस्थेची असलेले ऋणानुबंध व संस्थेला लाभलेले सहकार्य याविषयी माहिती सांगितली. तसेच सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतरांचा संस्थेविषयीचा सेवाभाव, शिस्तप्रिय वृत्ती व विद्यार्थ्यांना प्रति असलेली आत्मीयता याविषयी सांगत पुढील काळातही असे सहकार्य लाभावे अशी अपेक्षा व्यक्त केली व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तदनंतर संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, सोमनाथ आल्हाट, सुनिता गिरी यांनी या सेवानिवृत्त शिक्षकांचे जीवन कार्याचा मागोबा घेत त्यांची शाळेतील भूमिका, त्यांच्यातील असलेले कला व गुण शाळेच्या प्रगतीसाठी किती महत्त्वाचे होते हे विशद केले.
सेवानिवृत्त शिक्षकांच्या परिवाराच्यावतीने अनिकेत भोसले, नवीन खुंटे, जानवी खुंटे यांनी त्यांची परिवारातील भूमिका व त्यांनी दिलेले संस्कार यामुळेच आम्ही आज समाजामध्ये आदर्श जीवन जगत आहोत अशी भावना व्यक्त केली.
शुभेच्छांना उत्तर देताना संध्या भोज व शिवाजी जाधव यांनी संस्थेतील सेवा दरम्यान संस्थेकडून मिळालेला आदर व सहकार्य यामुळे आम्ही या संस्थेमध्ये चांगले कार्य करू शकलो अशा भावना व्यक्त करत भावूक झाले.
नंतर प्रल्हाद कोकरे यांनी सेवानिवृत्त शिक्षका विषयी बोलताना म्हणाले की ज्ञानदान करणारा व्यक्ती कधीही सेवानिवृत्त होत नसतो. त्याचे ज्ञानदानाचे कार्य शाळेत नव्हे तर शाळेच्या बाहेरही सुरूच असते असे सांगत विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन जीवनामध्ये यशस्वी वाटचाल करावी असे सांगितले. व सर्वांना शुभेच्छा दिल्या. बँकेच्या वतीने या संस्थेस याही पुढे सहकार्य करीत राहू असे सांगितले.
शेवटी अध्यक्ष भाषणामध्ये एकनाथ म. कोष्टी यांनी आळंदी मध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालय हे आदर्श विद्यालय असून या ठिकाणी सेवा करणे म्हणजे आपले भाग्य असून ती माऊलीची सेवा करणे होय असे गौरवोद्गार काढले. तसेच सेवानिवृत्त शिक्षकांनी उर्वरित आयुष्यात ज्ञानेश्वरी व गाथा यांचे पारायण करत आपला जीवन प्रवास सुखद करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आणि सर्वांना पुढील आयुष्यासाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार उपप्राचार्य किसन राठोड यांनी व्यक्त केले. माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.