पुणे/आळंदी :- श्री ज्ञानेश्वर विद्यालयात नवागत विद्यार्थी यांच स्वागत, मोफत पाठ्यपुस्तक वाटप व प्रशालेत १००% उपस्थित विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

पुणे/आळंदी :- श्री ज्ञानेश्वर विद्यालयात नवागत विद्यार्थी यांच स्वागत, मोफत पाठ्यपुस्तक वाटप व प्रशालेत १००% उपस्थित विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न
वार्ताहर :- अनिल जोगदंड
( चीप ब्युरो महाराष्ट्र राज्य Indianow 24)
दीर्घसुट्टीनंतर पुन्हा एकदा उंच व विशाल आकाशामध्ये उंच भरारी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून शाळेच्या दिशेने झेपलेले पाऊल शाळेच्या प्रांगणात येऊन स्थिरावली. यावर्षी नव्याने प्रवेश घेतलेल्या विविध इयत्तेतील सर्व नवागत विद्यार्थ्यांचे श्री ज्ञानेश्वर विद्यालयात स्वागत, पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप व प्रशालेत गतवर्षी १००% उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा, राम मंदिरावर विश्वस्त झालेल्या विश्वस्तांचा सत्कार समारंभ हे कार्यक्रम संपन्न झाले. या निमित्ताने सन २०२५ – २६ या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी सनईच्या सुमधुर वाद्यासह फूल – पाकळ्यांची उधळण करून ढोल आणि बँड च्या निनादात दिमाखदार वातावरणात स्वागत करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रसन्न आणि प्रेरणादायी वातावरणात व्हावी यासाठी पहिल्या दिवशी संपूर्ण शाळा परिसर रांगोळी फुलांनी रंगीबेरंगी फुग्यांनी आणि आकर्षक फलक लेखनाने सजवण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह. भ. प. भाऊसाहेब मोडेकर, प्रमुख उपस्थिती मनशक्ती केंद्र (लोणावळा) चे अजित फफाळे, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, आळंदी देवाची येथील शिवसेनेचे शहराध्यक्ष राहुल चव्हाण, , अविनाश गुळुंजकर, चारुदत्त प्रसादे तसेच संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, सुरेश घुंडरे, पत्रकार महादेव पाखरे, अनिल जोगदंड, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये अजित वडगावकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केली. दहा पंधरा वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या उपस्थिती वाढविण्या संदर्भात सुरू केलेला उपक्रम, विविध प्रयत्न केले व 100% उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थी ,पालकांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन सुरू केला. सुरुवातीला अतिशय नगन्य संख्येने 100% उपस्थित राहणारे विद्यार्थी त्यानंतर हळूहळू दरवर्षी त्यात होत गेलेली वाढ. यावर्षी जवळजवळ 70 विद्यार्थी वर्षभर एकदाही गैरहजर राहिले नाही या उपक्रमात ाढत्या विद्यार्थी संख्ये चे स्वरूप पाहता उपक्रम यशस्वी झाल्याचे सांगितले. पर्यायाने शाळेची गुणवत्ता वाढली. तसेच नवीन शैक्षणिक सालामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेच्या गुणवत्ता व इतर क्षेत्रांमध्ये खूप यश संपादन करून संस्थेचे नाव मोठे करावे यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या.
शिक्षणाच्या वाटेवर सतत चालत राहणं हीच यशाची पहिली पायरी असते आणि याला अनुसरून शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ या वर्षामध्ये प्रशालेत १००% उपस्थित राहणाऱ्या एकूण ६९ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व दप्तर बक्षिस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच शासन निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची औचित्य साधून श्रीराम मंदिर च्या विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल अविनाश गुळुंजकर व चारुदत्त प्रसादे यांचा श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
तद्नंतर संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, आळंदी शिवसेना शहराध्यक्ष राहुल चव्हाण यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या. राहुल चव्हाण यांनी मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे शाळेच्या प्रगती बद्दल गौरव उद्गार काढले व या शाळेस मी सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली .प्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या ऐच्छिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य या ज्ञानमंदिरात केले जाते त्यासाठी कोणीही या स्पर्धेमध्ये आत्मविश्वासाने उतरून यशस्वी होऊ शकतो असे सांगितले. त्यानंतर मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच शालेय उपक्रमांचे, वातावरणाचे व प्रशालेत १००% उपस्थिती राहीलेल्या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, शिक्षक व संस्था यांचे कौतुक केले. नवीन वर्षासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
अजित कपाळे यांनी प्र.के. अत्रेंच्या कवितेच्या ओळीतून प्रशालेच्या सर्व घटकांचे तसेच कार्यक्रमाचे कौतुक करत १००% उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच जीवनामध्ये आव्हानांना, अडचणींना सामोरे जाण्यासाठी अभ्यासाची आवश्यकता तसेच नियोजनबद्ध निरंतर कष्टाची तयारी, अपयश पचवण्याची क्षमता, योग्य ठिकाणी नकार देण्याची तयारी, यशामध्ये स्थिर राहण्याची आवश्यकता याबरोबरच चांगल्या विचारांची कृती जोडणे आवश्यक असल्याचे सांगितले व यासाठी रोज आई-वडिलांना वंदन करण्यासाठी प्रेरित केले.
अध्यक्षीय मनोगतातून ह भ प भाऊसाहेब महाराज मोडेकर यांनी सर्व विद्यार्थी शिक्षक यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल चव्हाण यांनी केले व सर्व उपस्थितांचे आभार प्रदीप काळे यांनी व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाचे सांगता झाली.