पवना नदीसुधार प्रकल्पाबाबत नागरिकांचा निषेध

पवना नदीसुधार प्रकल्पाबाबत नागरिकांचा निषेध
१३ जुलै रोजी संध्याकाळी आकुर्डी येथे स्थानिक तरुण आणि रहिवाशांसह सुमारे ८० नागरिकांनी एका पवना नदीसुधार प्रकल्पाचा निषेध म्हणून पथनाट्ये, गाणी सादर केली आणि फलक दाखवत लक्ष वेधून घेतले. रस्त्यावरून जाणारे लोक हे संदेश वाचण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी आणि नदीच्या स्थितीबद्दल प्रश्न विचारण्यासाठी आवर्जून थांबत होते . नदीच्या आरोग्याबद्दल आणि नागरी सहभागाबद्दल जागरूकता निर्माण करण्यात या कार्यक्रमाला यश आले.
गेल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला १,५०० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी मिळाली. ह्यात पिंपरी-चिंचवडमध्ये पवनेच्या किनारी सुमारे २४.४ किमी बांधकाम होणार आहे. नदीकाठचे नियोजित तटबंध आणि बांधकाम यामुळे पवनेच्या काठावरील समृद्ध जैवविविधता नष्ट होणार आहे. स्थानिक पक्षी, सरपटणारे प्राणी, कासवे आणि झाडे यांचा विनाश होणार आहे. चिंचवड या ऐतिहासिक स्थानाला नद्यांना जोडणारा नैसर्गिक वारसा नष्ट होण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. हा प्रकल्प नदी स्वच्छतेसाठी नाही. या प्रकल्पाचे सुमारे ८०% बजेट हे बांधकाम उपक्रमांसाठी आहे.
नागरिकांना वाटते, की नदी पुनरुज्जीवनात जैवविविधता, स्थानिक वनस्पतींचे जतन आणि प्रदूषण नियंत्रणाला प्राधान्य दिले पाहिजे. नदीकिनारी सुशोभीकरण आणि जॉगिंग ट्रॅक नको आहे. कलेच्या माध्यमातून नदी आणि झाडांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि प्रशासनाला प्रश्न विचारण्याचा हा एक आगळावेगळा प्रयोग होता. मुळा, पवना आणि इंद्रायणी नद्यांचे जतन करण्यासाठी नागरिकांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे.